काळजी करू नका; ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइनची सोय

काळजी करू नका; ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइनची सोय
-2 डिसेंबर 5.30 पर्यंत करता येईल अर्ज

प्रतिनिधी
नागपूर : निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार धावपळ करताना दिसतायेत. मात्र, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. वेबसाइट डाऊन झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.

राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी उद्याचा (2 डिसेंबर) शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांची धडपड पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी परवानगी द्यावी अशी आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील राज्य निवडणूक आयोगाला लिहलं होते. अखेर निवडणूक आयोगानं ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.

-वेबसाइट हँग, उमेदवार अडचणीत
सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यातील सात हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे. मात्र सध्या अर्ज भरताना ‘पंचायत महाराष्ट्र इलेक्शन महाराष्ट्र डॉट गव्हरमेंट डॉट इन’ ही वेबसाईड हँग होत असल्यामुळं उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे कसे? असा प्रश्न उमेदवारांसमोरं उभा राहिला होता. एका ग्रामपंचायतीसाठी 40 ते 50 अर्ज असल्यामुळे अनेक उमेदवार सध्या अर्ज भर शकले नसल्याचं समोरं आलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणाहून अडचणी येत होत्या. निवडणूक आयोगानं ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी मान्य केली आहे. आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे.