धक्कादायक : अंजली दमानिया यांचे बीड प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप
-मूक मोर्चातून वेधले लक्ष
प्रतिनिधी
बीड : परळी येथील औष्णिक वीज केंद्रातून कोणत्याही परवानगीशिवाय होणारी राख वाहतूक, वाळूउपसा यासह विविध अवैध धंद्यांमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असून, याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने कराड याला संरक्षण मिळत असल्याने संतोष देशमुख यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे केवळ खंडणी प्रकरणात नव्हे, हत्येच्या गुन्ह्यात कराडला आरोपी करावे, तसेच या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मूक मोर्चातून करण्यात आली.
याप्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही अनेक दावे केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात होत चाललंय. सर्वच पक्षांना व्हिनिबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी चुकीचे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात. लोकांना पर्याय नसतो त्यामुळे या लोकांनाच निवडून पाठवावं लागतं. २८८ पैकी ११८ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार असे गुन्हे आहेत. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड गँग तयार होणार आहे. आम्ही ठिय्या आंदोलन न करता नवीन प्रकारचं आंदोलन करणार आहोत”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, मी गणपतीची शपथ घेऊन सांगते धनंजय मुंडेंचे एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे आंदोलन नाही. एकत्रित सर्वांविरोधात लढणे शक्य नाही. राजकारणाचचे गुन्हेगारीकरण थांबवणं गरजेचे आहे. मी जेव्हा खडसेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं तेव्हा म्हणाले की तुम्ही माळी समाजाविरोधात आंदोलन करत आहा. त्यामुळे असं बोलणं बंद करा. मी जे बोलते ते खरं आहे की नाही ते सांगा. सगळीकडे मी एकटी पोहोचू शकणार नाही. तिथल्या जनतेनेही आवाज उठवला पाहिजे. माझ्यासारख्या दोनशे तीनशे अंजली जन्माला आल्या तर हा लढा देता येईल”, असं आवाहनही त्यांनी केलं.


