कोण म्हणाले, राज्यातील या त्रिकुटाला पायउतार करा
-लाडक्या बहिणींच्या किचनवर डल्ला
प्रतिनिधी
चंद्रपूर : महायुती सरकारने खोटा गाजावाजा करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना अंमलात आणली. राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असताना केवळ सत्ताप्राप्तीसाठी चालवलेला हा केविलवाणा प्रयत्न अखेर सपेशल अपयशी ठरला. सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्याच घरात दरोडा टाकण्याचा प्रकार चालवला आहे. बहिणींसाठी पैसे जमा व्हावे, म्हणून सरकारने खाद्यतेलाच्या सीमाशुल्कात प्रचंड वाढ केली, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी गेल्या दहा वर्षांतील भाजप सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन मतदान केले. यात देशातील वाढलेली महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नोकऱ्यांमधील खासगीकरण, शेतकरी आत्महत्या, वाढलेली गुन्हेगारी, देशावर वाढलेले कर्जाचे डोंगर, या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. असे असतानाही देशात धार्मिक तेढ निर्माण करून अराजकता पसरवू पाहणाऱ्या भाजपाने राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र यात त्यांच्या पदरी अपयश आले. देशातील मतदारांनी ‘इंडिया आघाडी’ला साथ देत संविधान बदलू पाहणाऱ्या मनुवाद्यांना जोरदार धक्का दिला.
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणली. महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्याचा खोटा गाजावाजा राज्य सरकारने केला.
महायुती सरकारने विधानसभेत सत्ताप्राप्तीसाठी मध्यप्रदेशाच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. राज्याच्या तिजोरीत आधीच ठणठणाट असताना तसेच अर्थसंकल्पात कुठलीही मोठी तरतूद नसतानाही राज्य सरकारने ही उठाठेव केली. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायचे कुठून? असा गंभीर प्रश्न सरकारपुढे उभा आहे. यासाठी सरकारने पुन्हा एकदा बहिणींच्याच घरात दरोडा टाकण्याचा प्रकार चालवला आहे. सरकारने खाद्यतेलाच्या सीमाशुलकात १२.५ टक्क्यांवरून ३२.५ टक्के एवढी प्रचंड वाढ केली आहे. यामुळे लाडक्या बहिणींचे बजेट पूर्णत: कोलमडेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
एकीकडे लाडक्या बहिणींना पैसे दिल्याचा आणि देत असल्याचा खोटा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र बहिणींच्याच घरात दरोडा टाकायचा. अशा दुहेरी लुटारू भूमिकेमुळे या योजनेचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. अशा निष्ठूर व निर्दयी सरकारला आता धडा शिकवणे काळाची गरज आहे. म्हणून राज्यातील या लुटारू त्रिकूट सरकारला आगामी निवडणुकीत सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.


