नागपुरात फडणवीस का म्हणाले, उपराजधानीत घडणाऱ्या गुन्ह्यांची क्षणात उकल
-आधुनिक ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे लोकार्पण
प्रतिनिधी
नागपूर : देशात महाराष्ट्र पोलीस दल आधुनिक आणि डिजिटल करण्याच्या प्रयत्न शासनाने केला आहे. देशातील सर्वात आधुनिक ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ नागपुरात बनवण्यात आले आहे. येथे शासकीय विभागाचे ३६०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि मेट्रो, बसस्थानक, रेल्वेस्थानकासह काही खासगी प्रतिष्ठानाचे असे ५८०० सीसीटीव्ही कॅमेरे जोडलेले आहेत. त्यामुळे शहरात कोणताही गुन्हा घडल्यास तो उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना आता कठीण जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते नागपूर पोलीस आयुक्तालयाच्यातर्फे आयोजित ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’चे लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
नागपूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमालाचे फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ‘सीम्बा’ नावाच्या ॲपचेही लोकार्पण करण्यात आले. नागपूर पोलिसांकडे असलेल्या नव्या तंत्रप्रणालीमुळे शहरात कुठेही घडलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला अगदी काही मिनिटात पकडता येईल. एवढेच नव्हे तर पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला असून चेहरे ओळखणारे आणि आवाजावरून गुन्हेगार ओळखणारे आणि शरीराच्या हालचालींवरून व्यक्ती ओळखणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पोलिसांना आता गुन्हेगार आणि टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होईल. १५ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रावरून आताचा गुन्हेगार ओळखण्याचे तंत्र पोलिसांनी आत्मसात केले आहे. ५ हजार ८०० सीसीटीव्हीद्वारे शहरात नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्यांनाही सेंटरला जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, पोलीस आयु्क्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल उपस्थित होत्या.


