राहुल गांधी का म्हणाले ?, खुशाल भाजपात जा !

राहुल गांधी का म्हणाले ?, खुशाल भाजपात जा !

-गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना भाष्य

प्रतिनिधी
गुजरात : भाजपाशी संगनमत करणाऱ्या २०- ३० लोकांना गरज पडल्यास पक्षातून काढून टाकायलाही तयार असल्याचे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी व्यासपीठावर बोलताना त्यांच्यातला संताप दिसून आला. राहुल गांधी यांनी गुजरातमधील पक्षाच्या काही नेत्यांवर भाजपात सामील झाल्याचा आरोप केला. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, शिवाय काही नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पक्षाशी गद्दारी केल्यास काढून टाकण्याचा इशारा पक्षातल्या लोकांना दिला आहे.

गेल्या २० ते ३० वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष गुजरातमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण का करू शकला नाही? याचं कारण म्हणजे गुजरातचे नेतृत्व, कार्यकर्ते, पक्षातील जिल्हा अध्यक्ष हे दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. एक जे जनतेसोबत उभे राहतात, त्यांच्यासाठी लढतात, त्यांचा आदर करतात. दुसरा गट अगदी याच्या विरुद्ध आहे जो अलिप्त बसतो, लोकांचा आदर करत नाही आणि भाजपाशी संगनमत करत आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शनिवारी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले.

,