राजकीय चर्चांना उधाण : शरद पवारांनी आरएसएसचं केले कौतुक

राजकीय चर्चांना उधाण : शरद पवारांनी आरएसएसचं केले कौतुक

-फडणवीस म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं

प्रतिनिधी
नागपूर : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयाचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील दिले जात आहे. महायुतीचे विरोधक व ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख) यांनी आरएसएसचं कौतुक केलं आहे. शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं”. शरद पवारांनी संघाचे कौतुक केल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि शरद पवारांच्या पक्षात जवळीक वाढतेय का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावंच असं वाटत नाही, परंतु काहीही होऊ शकतं”.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल की त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढं मोठं वायूमंडळ तयार केलं होतं. परंतु, ते एका मिनिटात पंक्चर कसं काय झालं? ते वायूमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोण आहे? त्यांच्या लक्षात आलं की ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी कधीतरी प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करावं लागतं, त्या हिशोबाने त्यांनी संघाचं कौतुक केलं असेल, असं मला वाटतं”.

देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की भाजपा व शरद पवारांची जवळीक वाढतेय का? तसं असेल तर अनेकांच्या मनात याबद्दल भीती आहे. यावर फडणवीस म्हणाले, “तुम्ही २०१९ नंतर माझी वक्तव्ये पाहिली असतील तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. काही गोष्टी माझ्याही लक्षात आल्या की कुठलीही गोष्ट होणारच नाही असं समजून चालायचं नाही. राजकारणात काहीही होऊ शकतं. तसं काही झालंच पाहिजे असं नाही. मात्र उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, मग राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावं असं नाही, परंतु ते होणं फार चांगलं आहे असं मला वाटत नाही. ते व्हावं या मताचा मी नाही. मात्र राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा भरवसा नाही.