मुंबईत युती पण प्रकाश आंबेडकरांची परभणीत काँग्रेसवर सडकून टीका
-म्हणाले, काँग्रेसकडे आता काही राहिले नाही
प्रतिनिधी
परभणी : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुंख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वच पक्षांचे बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. आज परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा केला.
परभणीतील सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘काँग्रेसकडे आता मतदार उरला नाहीये, केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिलाय. तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागतात, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागलात, म्हणून तुमची अशी अवस्था झाली आहे. बाबाजाणी यांनी खतीब यांचा उपयोग करून घेतलाय आणि आता ते काँग्रेसचीच वाट लावायला निघालेत, अशी टीका आंबेडकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘इथल्या मुस्लिमांना आवाहन आहे, काँग्रेसकडे आता काही राहील नाहीये, फक्त मुस्लिम मतदार उरला आहे. काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागल्याने असं झालंय. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच आहेत. आता काँग्रेसकडे मतदार नाही, तेव्हा उद्याच्या व्यवस्थेमध्ये संविधान टिकलं पाहिजे असं वाटत असेल तर मुस्लिमांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे.’
या सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी बिनविरोध नगर सेवकांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे. आमदारांनी उमेदवारांना दमदाटी करून पळवले आहे. काही ठिकाणी विकत घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याची सिस्टीम आता बंद केली पाहिजेत अशी मागणी आम्ही करणार आहोत. तरच लोकशाही टिकेल अस आम्ही मानतो.
या निवडणुकीत महायुतीतील पक्ष वेगळे लढत आहेत. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत. इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला यांना संपवता येईल असं त्यांना वाटतं आहे. म्हणून त्यांनी येती केली नाही. सत्ता आली नाही की पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे. सगळीकडे अजित पवार युतीतून वेगळं लढतायेत. मुस्लिमांचे मत विभाजन करण्याचे ते बघतायेत.


