दिल्लीसाठी काँग्रेसने थेट यादीच जाहीर केली, हे आहेत उमेदवार
-काँग्रेसचे मिशन दिल्ली
प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून सरकारही स्थापन झालं आहे. महाराष्ट्राची ही निवडणूक देशभर चर्चेचा विषय राहिली. महायुतीला मिळालेला एकहाती विजय अवघ्या देशासाठी अचंबित करणारी गोष्ट होती. आता महाराष्ट्रानंतर दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. दिल्लीत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरीही विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज २१ उमेदवारांची यादीही जाहीर केली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित हे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत.
दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, जय किशन आणि हारून युसूफ, अनिल कुमार यांचीही या यादीत नावे आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसने विधानसभेसाठी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. “या अशा जागा आहेत जिथे पक्षाला केवळ जिंकण्याची संधी आहे असा विश्वास वाटत नाही तर या उमेदवारांशिवाय पर्याय नव्हता अशा जागाही निवडल्या गेल्या”, असे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक्सवर एक पोस्ट करत सांगितले की, “आम आदमी पक्ष दिल्लीत स्वतःच्या ताकदीवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर युती होण्याची कोणतीही शक्यता नाही.” दुसरीकडे दिल्लीचे काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी वार्ताहरांना सांगितले की, “आम्ही विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार आहोत. आम्ही भ्रष्टाचारी केजरीवाल यांच्या पक्षाशी कोणतीही युती करणार नाही. त्यांच्याशी युती केल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागली आहे.”
दरम्यान राहुल गांधी यांची दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांची बैठकीतील अनुपस्थिती केंद्रीय नेतृत्त्व आणि दिल्ली काँग्रेस यांच्यात दिल्ली विधानसभा आणि आपबरोबरच्या युतीच्या मुद्द्याबाबत असलेला दुरावा अधोरेखित करते. ७ डिसेंबरला समारोप झालेल्या दिल्ली न्याय यात्रेत काँग्रेसचा कोणताही महत्त्वाचा नेता सहभागी झाला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आप सरकारला लक्ष्य करण्यासाठी आखलेल्या या कार्यक्रमात सहभागी होऊन केजरीवालांना विरोध करण्याचा धोका काँग्रेच्या केंद्रीय नेतृत्त्वाला पत्करायचा नव्हता. याबाबत काँग्रेस कमिटीतील सूत्राने सांगितले की, “भारत न्याय यात्रेत रोजच आम आदमी पक्षाला लक्ष्य केले जात होते. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे चुकीला संदेश गेला असता आणि युती होण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या.”


