ठरले कारण : या भाजपाच्या नेत्याविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा संताप
-हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याचा आरोप
प्रतिनिधी
अमरावती : अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या व बांगलादेशी राहतात, त्यांनी खोट्या दस्तावेजांच्या आधारे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जन्म दाखले मिळवले, असा आरोप करत यंत्रणेसह सर्वांची झोप उडवून देणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी काँग्रेसने चालवली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे वातावरण बिघडून हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे वारंवार जिल्ह्यात येऊन येथील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर दबाव आणत आहेत. काही प्रकरणांमध्ये खोट्या दाखल्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे पुढे आले आहे. त्यात यंत्रणेमार्फत पोलीस तक्रारही झाली आहे. परंतु त्या प्रकरणांतही कुणी बांगलादेशी किंवा रोहिंग्याशी संबंधित असल्याचे पुढे आले नाही. त्यामुळे सोमय्या यांनी जाणीवपूर्वक अमरावती जिल्ह्याची बदनामी केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
किरीट सोमय्या यांच्यामुळे महसूलची यंत्रणा धास्तावलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण पात्र असताना व दाखले देण्याबाबतचा बंदी आदेश मागे घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. सध्या शैक्षणिक कामकाजासाठी विद्यार्थ्यांना अनेक दाखल्यांची गरज आहे. मात्र त्यांना ती दिली जात नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.


