कुणाला धोका : अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघात असे राहील चित्र

कुणाला धोका : अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघात असे राहील चित्र

-अनेक ठिकाणी बहुरंगी लढत

कुमार तट्टे
अमरावती : जिल्‍ह्यात आठ मतदारसंघांपैकी अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये मुख्‍य लढत आहे. महाविकास आघाडीला अस्तित्‍व कायम राखण्‍याची संधी असताना महायुतीसमोर गतवैभव प्राप्‍त करून देण्‍याचे आव्‍हान आहे. दोन जागांचा अपवाद वगळता इतर ठिकाणी झालेली बंडखोरी तसेच ‘अ‍ॅन्‍टी इन्‍कबन्‍सी’चा सामना प्रस्‍थापितांना करावा लागत असून नव्‍या उमेदवारांनी यावेळी लढतीत रंगत आणली आहे.

अमरावती राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि काँग्रेसमध्ये मुख्‍य लढतीचे चित्र असताना भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांच्‍या उमेदवारीने या लढतीतील उत्‍कंठा वाढवली आहे. राजकारणातील तीन दिग्‍गज या निवडणुकीत समोरा-समोर आले आहेत. मतांच्‍या ध्रुवीकरणाच्‍या आधारे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या सुलभा खोडके आणि काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांच्‍या भवितव्‍याचा फैसला होणार आहे.

बडनेरातील बहुरंगी लढत रंजक वळणावर पोहचली असून युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुनील खराटे, शिवसेनेच्‍या बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती बंड आणि भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांच्‍यातील मुकाबल्‍यात जातीय समीकरणे महत्‍वाची ठरणार आहेत. गेल्‍या तीन निवडणुकांमध्‍ये मतविभाजनातून रवी राणा यांना विजयाची संधी मिळाली होती. मात्र, यावेळी त्‍यांच्‍यासमोर प्रस्‍थापित विरोधी मतांचा प्रवाह रोखण्‍याचे आव्‍हान आहे.

मोर्शीतून राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) देवेंद्र भुयार, भाजपचे उमेश यावलकर, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) गिरीश कराळे आणि अपक्ष विक्रम ठाकरे यांच्‍यात लढतीचे चित्र आहे. कुणबी, माळी आणि मुस्‍लीम मतांच्‍या विभागणीवर विजयाचे गणित ठरणार आहे. धामणगाव रेल्‍वेत भाजपचे प्रताप अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि वंचित बहुजन आघाडीचे नीलेश विश्‍वकर्मा यांच्‍यात पुन्‍हा एकदा तिहेरी लढतीचे चित्र आहे.