आघाडीचा शब्द : महिलांच्या खात्यात खटाखट पोहचणार दरमहा ३ हजार रुपये
-इंडिया आघाडीच्या प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस
प्रतिनिधी
मुंबई : भाजपा आणि संघाकडून संविधान कमकुवत केलं जातं आहे. छुपेपणाने हे धोरण राबवलं जातं आहे. आज देशभरात विद्यापीठांमध्ये जे कुलगुरु आहेत त्यांची यादी काढा. त्यात तुम्हाला संघाचेच सदस्य दिसतील. भुगोल, इतिहास, विज्ञान माहीत नसेल तरीही काही फरक पडत नाही. संघाचे आहात तर तुम्हाला कुलगुरु केलं जातं असं राहुल गांधी म्हणाले. इंडिया आघाडीची पहिली प्रचारसभा मुंबईत पार पडली. त्यावेळी राहुल गांधींनी भाजपावर टीका करत महालक्ष्मी योजनेची घोषणाही निवडणुकीच्या अनुषंगाने केली आहे.
निवडणूक आयोग, इडी, सीबीआय, प्राप्तीकर विभाग यांचा वापर करुन सरकार पाडतं. महाविकास आघाडीचं सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार होतं. ते सरकार पाडण्यात आलं. पैसे देऊन लोक विकत घेतले गेले आणि सरकार पाडलं. कारण काही व्यावसायिकांची मदत भाजपाला करायची होती. मुंबईतली धारावीची जमीन ही एक लाख कोटींची आहे. ही गरीबांची जमीन आहे. ही जमीन गरीबांकडून हिसकावली जाते आहे. सगळ्या जगाला हे सत्य आता समजलं आहे. जगासमोर ही जमीन अदाणींना दिली जाते आहे. जे प्रकल्प होते मग ती अॅपलची फॅक्टरी असो, बोईंगचं युनिट असो इथे येणारे व्यवसाय दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले असाही आरोप राहुल गांधींनी आपल्या भाषणात केला.
राहुल गांधी म्हणाले इथे युवकांना रोजगार मिळाला असता, पण एकामागोमाग एक प्रकल्प हिसकावले जात आहेत. १ लाख कोटींची जमीन हिसकावण्यात येते आहे. हे आहे भाजपाचं सरकार. तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला पैसे देऊ. भाजपा सरकार काय करतंय याचा अभ्यास आम्ही केला. पेट्रोल, गॅस यांच्या किंमती वाढल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाकडून दरवर्षी ९० हजार रुपये काढून अदाणी-अंबानींना दिले जातात. नंतर सांगितलं जातं की महिलांना १५०० रुपये देणार. मात्र यांची नियत चांगली नाही. हे सगळे अदाणी आणि अंबानींची मदत करणारे लोक आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला.
–महाराष्ट्र राज्यात प्रचंड बेरोजगारी
नोटबंदी, जीएसटी यामुळे तुम्हाला फायदा झाला का? तुम्हाला महागाई, बेकारी हे सगळं हवं आहे का? देशात सर्वात जास्त बेरोजगारी आज आहे. महाराष्ट्रच नाही कुठल्याही राज्यात बेकारीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. मोदी, भाजपाची धोरणं यामुळे बेकारी वाढली आहे. त्यामुळे रोजगार मिळूच शकत नाही अशी स्थिती निर्माण केली गेली आहे. लघू आणि मध्यम व्यावसायिकांना एक एक करुन संपवण्यात आलं. अदाणी-अंबानी रोजगार देऊ शकत नाहीत. रोजगार लघू आणि मध्यम व्यावसायिक, कारखानदार हेच रोजगार देऊ शकले असते. मात्र यांना संपवण्याचं काम भाजपाने केलं. नोटबंदी, जीएसटी ही धोरणं नाही तर ही हत्यारं आहेत. तुम्ही जीएसटी भरता, जेवढा जीएसटी भारतातला गरीब नागरिक देतो तेवढाच जीएसटी अदाणी अंबानी भरतात. हे जीएसटीचं वास्तव आहे. गरीब लोक करभरणा अत्यंत इमानदारीने करतात. हा अप्रत्यक्ष कर असतो त्यामुळे लक्षात येत नाही. प्रत्येक ठिकाणी हा अप्रत्यक्ष कर लागू होतो. ही असली भाजपाची धोरणं आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला. एका बाजूला अरबपतींचं राज्य, दुसरीकडे युवक, गरीब, व्यावसिक यांचं सरकार. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाच गॅरंटी दिल्या आहेत. यातली पहिली गॅरंटी मी आज तुम्हाला सांगतो आहे. असं राहुल गांधी म्हणाले.
–अशी राहील महालक्ष्मी योजना
महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत ३ हजार रुपये दरमहा आम्ही देणार आहोत. प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात ही रक्कम दिली जाईल. तीन हजार रुपये खटाखट खटाखट दिले जातील. महाराष्ट्रतील महिला महाराष्ट्रात बसमध्ये गेल्या तर त्यांना बस प्रवास मोफत केला जाईल. तुम्ही विचाराल का? कारण तुम्हाला महागाईने या सरकारने त्रस्त करुन टाकलं, तसंच गॅस सिलिंडर वाढ, महागाई यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आम्ही ही पहिली गॅरंटी जाहीर करत आहोत असं राहुल गांधींनी सांगितलं. इतर गॅरंटी तुम्हाला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे सांगतील असंही राहुल गांधी म्हणाले.


