आश्यर्यकारक उत्तर : भविष्यात भाजपा-उबाठाचे एकत्र येण्याचे संकेत
-फडणवीस म्हणतात, राजकारणात काहीही होऊ शकते
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर निवडणुकीनंतरचे समीकरण कसे असणार? त्यावर चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या टोकाचे मतभेद आहेत. परंतु ते पुन्हा एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारक उत्तर देत भविष्याचे संकेत दिले. राजकारणात काही होऊ शकते, असे फडणवीस यांनी म्हटले. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) याची गरज पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना युती होती. दोन्ही पक्ष एकत्र लढले. दोन्ही पक्ष मिळून पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु मुख्यमंत्रीपदावरुन निर्माण झालेल्या वादानंतर युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेससोबत युती करुन महाविकास आघाडीची सरकार बनवली. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपशी घरोबा केला. आता निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्याकडे आला असताना भाजप उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचे संकेत का देत आहे? हा एक प्रश्न आहे. भाजप आपल्या मतपेढीला उद्धव ठाकरे यांच्याबाबत यामाध्यमातून संदेश देत आहे. ते सत्तेसाठी कोणत्याही प्रकारचे गठबंधन करु शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना नुकतेच आव्हान दिले होते. त्यांनी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन दाखवावे. या मुद्यातून शिवसेना उबाठाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे, हा संदेश भाजप देत आहे.


