नाथाभाऊ का म्हणाले, एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राचा चिखल झाला

नाथाभाऊ का म्हणाले, एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राचा चिखल झाला

-नाव न घेता एबीपी माझाच्या मुलाखतीत फडणवीसांवर तोफ

प्रतिनिधी
मुंबई : मी मुख्यमंत्रिपदाची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली आहे. ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे १२३ आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा मुख्यमंत्रिपदासाठीचा पहिला दावा होता. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे एक सीडी होती असाही दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. तसंच दोन नेत्यांना कंटाळून मी भाजपा सोडली. सध्या जे काही राजकारण चाललं आहे त्या राजकारणात मला मुख्यमंत्रिपदही नकोच आहे असंही एकनाथ खडसे म्हणाले.

सध्याच्या घडीला महाराष्ट्र घाणेरडं राजकारण अनुभवतो आहे. तसंच सध्या मुख्यमंत्री एका पक्षाचा होऊच शकत नाही अशी स्थिती आहे. अशा स्थितीत मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा मुळीच नाही असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं. दुसऱ्याला आवरता आवरता किती सावरावं लागतंय आपण पाहतोय मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा इतर. निवडणूक आल्यावर कशी धावपळ होते ते सगळे बघत आहेतच. असंही एकनाथ खडसे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काही एक-दोन व्यक्तींनी राजकारणाचा चिखल झाला आहे. मी नाव न घेता सांगेन की एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. ते नाव मी घेण्याची गरज नाही ते कुणालाही विचारा माहीत आहे. सूडाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण सगळं महाराष्ट्रात घडलं आहे, त्याला एक व्यक्ती जबाबदार आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. ईडी, सीबीआय या यंत्रणांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. नीरव मोदीला का सोडलं आहे? माझ्या प्रकरणात माझा काय दोष आहे? मला सांगा. मला अकारण यामध्ये गोवण्यात आलं आहे, असंही खडसे यांनी म्हटले आहे.