ठाण्यात पाठिंबा देण्यावरून आंबेडकरांनी घातली ठाकरेंना ही अट

ठाण्यात पाठिंबा देण्यावरून आंबेडकरांनी घातली ठाकरेंना ही अट

-ठाण्यात २७ उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी
मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना जर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हवा असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला विनंती करायला हवी, अशी अट वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारे यांच्यासमोर ठेवली आहे.

२० मे रोजी पाचव्या टप्प्याचे ठाणे मतदारसंघात मतदान होत आहे. ठाण्यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे राजन विचारे अशी दोन्ही शिवसेनेत लढत आहे. येथे वंचितकडून निवृत्त वैद्यकीय अधिकार डॉ. रामराव केंद्रे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे.

बसप, बीआरएसपी ,रिपब्लिकनबहुजनवादी, भीमसेना या आंबेडकरवादी पक्षासह अपक्ष असे २७ उमेदवार ठाणेमध्ये रिंगणात आहेत. मात्र २०१९ च्या लोकसभेला वंचित उमेदवाराने ४७ हजार ४३२ मते घेतली होती. या मतदारसंघात वंचितने पाठिंबा कुणाला, हे स्पष्ट केलेले नाही.

मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून पाठिंब्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी सांगितले की, आपल्याला पाठिंबा हवा असेल तर आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करायला हवी, उमेदवारांच्या मागणीवर आम्ही पाठिंबा देत नाही. तसे आमचे धोरण आहे, असे विचारे यांना कळवलेले आहे.

वंचित राज्यात ४० जागा लढत असून ८ मतदारसंघात महायुती वगळता इतर पक्षीय उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनाचा एकही उमेदवार नाही. ठाणे मध्ये १९९६ पासून २००९ चा अपवाद वगळला तर येथे शिवसेनेचा खासदार जिंकून आलेला आहे. शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातली निवडणूक प्रचंड चुरशीची आहे.