उत्तर नागपुरात दलित मतांचे विभाजन काँग्रेसच्या उमेदवाराला पडेल भारी
-भाजपने दोनदा काबीज केला होता उत्तरचा गड
गजानन ढाकुलकर
नागपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात बौद्ध आणि मुस्लीम मतांच्या विभाजनातूनच भाजपला दोनदा यश मिळवता आले. १९९५ ला भाजपचे भोला बढेल आणि २०१४ ला डॉ. मिलिंद माने येथून विजयी झाले. यावेळी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षात मुख्य लढत असली तरी बसप आणि वंचित, अपक्ष उमेदवार अतुल खोब्रागडे मैदानात आहेत. त्यामुळे दलित मतांचे विभाजन झाल्यास भाजप २०१४ प्रमाणे यंदाही काँग्रेसच्या विजयाची घोडदौड रोखणार का? असा प्रश्न पुढे येत आहे.
उत्तर नागपूर हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मधल्या काळात रिपब्लिकन पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे काही बौद्ध मतदार हे बसपकडे वळले. परंतु, बसपलाही उत्तर नागपूर कधी सर करता आले नाही. भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० झाली असली तरी या काळात उत्तर नागपूरमध्ये त्यांनी उमेदवार दिला नाही. १९९० साली उत्तरमधून भाजपने पहिल्यांदा भोला बढेल यांच्या रूपाने निवडणूक लढवली. यावेळी बढेल यांची लढत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खोब्रागडे) उमेदवार उपेंद्र शेंडे यांच्याशी होती. शेंडे यांना ३३ हजार ६०३ मते मिळाली तर भोला बढेल २१३५८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. पुढे १९९५ च्या निवडणुकीत भोला बढेल पुन्हा मैदान उतरले असून ६३ हजार ४८८ मते घेत ते विजयी झाले. बौद्ध मतदारबहुल उत्तर नागपुरातील भाजपचा हा पहिलाच विजय होता. मात्र, यावेळी रिपाइंचे (खोब्रागडे) उपेंद्र शेंडे यांनी ४४ हजार मते घेतली होती. बसपने १६ हजार तर स्वतंत्र उमेदवार शेख मुस्तफा शेख हुसेन यांनी ११ हजार मते घेतली होती. या मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा २०१४ मध्ये भाजपचे डॉ. मिलिंद माने उत्तरमधून विजयी झाले. यावेळी बसपचे किशोर गजभिये यांनी ५५ हजार मते घेतली तर काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत ५० हजार मतांनी तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे मतविभाजन झाल्यावरच भाजपचा विजय शक्य असल्याचे दिसून येते.
–असे आहे जातीय समीकरण
उत्तर नागपूरमध्ये ४ लाख २५ हजार मतदार असून यात बौद्ध मतदारांची संख्या १ लाख ७० हजार इतकी आहे. याखालोखाल ८० हजार मुस्लीम मतदार आहेत. मध्य नागपूरप्रमाणे उत्तर नागपुरातही हलबांची १२ हजार मते आहेत. याशिवाय, पंजाबी आणि सिंधी समाजाची २५ हजारांच्या घरात मतदान आहे. आदिवासी समाजाचे ५ हजार मतदान आहे.


