भाजपाच्या या बड्या नेत्याचे बयाण; सरकारचे हायकमांड फडणवीसच
– कुणाला बरोबर घ्यायचे आणि कधी सोडायचे
प्रतिनिधी
सातारा : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा येथील पक्षाच्या एका बैठकीत एक सूचक वक्तव्य केले आहे. जयकुमार गोरे यांनी म्हटले की, राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. आपल्या नेतृत्वाला माहिती आहे की, कोणाला बरोबर घ्यायचे आणि कधी सोडायचे? त्यामुळे भाजप आता शिंदे गटाचा वापर करून त्यांना सोडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
राज्यातील शिंदे सरकारचा हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. कधी कोणाला सोबत घ्यायचे आणि कधी सोडायचे हे फडणवीस यांना चांगलंच समजतं. यामुळे समजनेवाले को इशारा काफी होता है, असे सूचक विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे. आमदार गोरें नी केलेले हे विधान नक्की कोणासाठी होत याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. गोरेंचा निशाणा जिल्ह्यातील अजित पवार गटाकडे तर नव्हता ना? अशा सुद्धा चर्चांना आता साताऱ्यात उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
गोरे म्हणाले, आजची टिफीन बैठक देशातील सर्वात मोठी बैठक ठरणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर देश चालतो, त्यांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. उदयनराजे भोसले यांनी आता केवळ जिल्ह्यात सक्रीय न राहता राज्यात कार्यरत व्हावे. उदयनराजे भोसले यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला त्यांना पाहायचे आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागून विविध राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आपल्या सर्वांना करावयाचे आहे. जिल्हा भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथनिहाय कामाला लागावे, असे जयकुमार गोरे म्हणाले. आमदार गोरे यांच्या वक्तव्यावरून भाजप आता शिंदे गट आणि अजित पवार गटाचा वापर करून त्यांना सोडणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.


