झालं पक्क! मुंबईत भाजपाचा महापौर तर रिपाइंचा उपमहापौर
-रामदास आठवले यांचा दावा
प्रतिनिधी
मुंबई : मुंबई मनपासाठी शिवसेना-भाजप आणि रिपाइंसह महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. आगामी काळात मुंबईच्या महापौरपदावर भाजप तर शिंदे गटासह रिपाइंला अडीच वर्षे उपमहापौरपद देण्यात येणार आहे, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. यामुळे आता मुंबई मनपातही भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात हा दावा केला आहे. या मेळाव्यास मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही उपसथित होते. त्यांच्यासमोर बोलताना आठवले म्हणाले की,आशिष शेलार यांनी उपमहापौर पद देणार असल्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. त्यामुळे आता युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायला हवी. अनुक्रमे अडीच वर्षे उपमहापौरपद शिवसेना आणि रिपाईला देण्यात येणार असून मुंबईत भाजपचा महापौर बसविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले की, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई मनपात 5 वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असे आश्वासन त्यांनी दिले. तर यावेळी बोलताना आशिष शेलारांनी रामदास आठवले यांच्यावर एक कविता सादर केली आहे.
अहंकारामुळे त्यांचे सरकार, पक्ष, चिन्ह गेले, पण जनसेवक म्हणून भाजप बरोबर राहिले रामदास आठवले… मतासाठी मोदींचे त्यांनी फोटो दाखवले, स्वार्थी सत्तेसाठी विश्वासघातकी झाले, पण आदर्श मैत्रीचे जीवंत उदाहरण रामदास आठवले… अशा शब्दांत आशिष शेलार रामदास आठवले यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.


