थेट बोलले: सावरकरांच्या मुद्यावरून शरद पवार

थेट बोलले: सावरकरांच्या मुद्यावरून शरद पवार

-सावरकर यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही

प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएस यांच्यामध्ये संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीत मांडली आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.

बैठकीत सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असे आवाहनही शरद पवारांनी केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांचा मुद्दा टाळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव सेनेची डिनर अनडिप्लोमसी

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांचा अवमान केल्याचा आरोप भाजप-शिवसेना करत आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव सेनेलाही याच मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेने घेरले आहे. त्यामुळे ‘हिंदुत्ववादी’ प्रतिमेला तडा गेलेल्या उद्धव ठाकरेंनी रविवारी ‘सावरकरांचा अवमान सहन करणार नाही’ असा इशारा मालेगावच्या सभेतून राहुल यांना दिला. इतकेच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंतर्फे आयोजित डिनरवर उद्धव सेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली.

-बैठकीला 18 पक्षांची उपस्थिती होती

काँग्रेसने सोमवारी सायंकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी डिनर आयोजित केले होते. तत्पूर्वी झालेल्या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. त्यात अदानी घोटाळ्यावरुन जेपीसीचा मुद्दा लावून धरण्याचे ठरले. राहुल गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले. डिनरमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), तृणमूल काँग्रेसचे नेते नव्हते. बैठकीला 18 पक्षांची उपस्थिती होती. यात राष्ट्रवादी, आप, जेएमएम, डीएमके, जेडीयू, बीआरएस, आरजेडी, सीपीआई, सीपीएम, आरएसपी, नेशनल कॉन्फ्रेंस, आईयूएमएल, एमडीएमके इत्यादीचे नेते सहभागी झाले होते. उद्धवसेना सावरकर मुद्यावरून नाराज असल्याने या बैठकीत त्यांचे खासदार सहभागी झाले नाही.

-आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे

उद्धव सेनेच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवी. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही शरद पवारांच्या मताचा आपण आदर करत असल्याचे सांगितले. तसेच, राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे म्हटल्याची माहिती आहे. त्यामुळे यापुढे राहुल गांधी सावरकारांविषयी बोलणे टाळणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.