नागपुरात महिलांच्या विकासाबाबत पंतप्रधान मोदींनी दिला हा सल्ला
-१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे वर्च्युअल उदघाटन
प्रतिनिधी
गजानन ढाकुलकर/विवेक पाटील
नागपूर : विज्ञान काँग्रेसची संकल्पना “महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे. पण, जीवन व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, हे लक्षात घेता महिलांच्या सहभागातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सक्षमीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आरटीएमएनयूच्या अमरावती मार्गावरील परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि आरटीएमएनयू शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष आर. चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (आयएससीए), कोलकाताच्या सरचिटणीस डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत स्टार्टअप इको सिस्टिममध्ये जगातील प्रथम तीन देशांत आहे. भारतीय विज्ञान परिषदेच्या थीमची जगभरात चर्चा आहे. जगाचे भविष्य शाश्वत विकासासोबतच सुरक्षित आहे. परिषदेने शाश्वत विकासाला महिला सक्षमीकरणासाेबत जोडले आहे. व्यावहारिकदृष्ट्याही हे दोन विषय एकमेकांशी जुळले आहेत.
क्वांटम मिशनची लवकरच घोषणा पीएम-एसटीआयएसीचे क्वांटम फ्रंटियर मिशन हे मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या प्रमाणात समकालीन आव्हानांपैकी एक म्हणून क्वांटम यांत्रिक प्रणाली समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी काम सुरू करणे आहे. या मिशनचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून लवकरच केंद्र सरकारकडून याची घोषणा केली जाईल, अशी माहिती पंतप्रधानांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार अजय सूद यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.


