थेट लिहिले मोदींना पत्र: राहुल गांधीच्या पत्रात काय आहे?

थेट लिहिले मोदींना पत्र: राहुल गांधीच्या पत्रात काय आहे?

– वाचा संपूर्ण मजकूर

प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी 30 जानेवारी रोजी राहुल गांधी श्रीनगरमध्ये होते. त्यानंतर काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्र लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधींनी काश्मिरी पंडितांच्या समस्या मांडल्या आहेत. त्यांनी लिहिले की, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या नावावर काश्मिरी पंडितांना खोऱ्यात काम करण्यास भाग पाडले जात आहे. तसेच त्यांच्यासाठी उपराज्यपालांनी (मनोज सिन्हा) ‘भिकारी’ सारख्या शब्दांचा केलेला वापर बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यांनी पंतप्रधानांना काश्मिरी पंडितांच्या चिंता दूर करण्यासाठी योग्य पावले टाकण्याची मागणी केली आहे.

-वाचा संपूर्ण पत्र जशाच्या तसे

प्रिय पंतप्रधान,

आशा आहे, तुम्ही उत्तम असाल. या पत्राद्वारे मी आपणास काश्मीर खोर्‍यातील विस्थापित काश्मिरी पंडित समुदायाच्या दुर्दशेकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित आणि इतरांच्या अलीकडच्या काळात झालेल्या टार्गेट किलिंगमुळे खोऱ्यात भीतीचे आणि निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

.पंतप्रधान महोदय, संपूर्ण भारताला प्रेम आणि एकात्मतेच्या धाग्यात जोडण्यासाठी चालू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या जम्मू टप्प्यात काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. सरकारी अधिकारी काश्मीर खोऱ्यात कामावर परत जाण्यास बळजबरीने बाग पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षिततेची कोणतीही ठोस हमी न देता खोऱ्यात कामावर जाण्यास भाग पाडणे हे अत्यंत क्रूर पाऊल आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत आणि सामान्य होईपर्यंत सरकार या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांकडून इतर प्रशासकीय आणि सार्वजनिक कामांमध्ये सेवा घेऊ शकते.

आपल्या सुरक्षेची आणि कुटुंबाच्या काळजीची याचना करणारे काश्मिरी पंडित आज सरकारकडून सहानुभूती आणि आपुलकीची अपेक्षा करत आहेत, अशातच उपराज्यपालांनी (मनोज सिन्हा) त्यांच्यासाठी ‘भिकारी’ असे शब्द वापरणे हे बेजबाबदारपणाचे आहे. पंतप्रधान महोदय, स्थानिक प्रशासनाची ही असंवेदनशील कार्यशैली तुम्हाला कदाचित परिचित नसेल.

मी काश्मिरी पंडित बंधू आणि भगिनींना आश्वासन दिले आहे. की त्यांच्या समस्या आणि मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मला आशा आहे की, आपणास ही माहिती मिळताच आपण याबाबत योग्य ती पावले उचलाल.

माता खीर भवानींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो.

-धन्यवाद
राहुल गांधी