का फोडले बच्चू कडू यांनी मीडियावर खापर ?
– नागपुरात काय म्हणाले कडू
प्रतिनिधी
नागपूर : अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेले आठ दिवस खोक्यांवरून सुरू असलेल्या वादाचे खापर बच्चू कडू शेवटी मीडियावर फोडले. आठ दिवसांपासून तेच ते सुरू आहे. त्यामुळे मीडियाने हा विषय थांबवावा, अशी विनंती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली.
मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आले असता तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले. पहिले तर मला मीडियाला सांगायचे आहे की, आता हा विषय तुम्ही थांबवा. आमच्याकडून थांबवणे नाही झाले तरी मीडियाने मात्र हा विषय थांबवला पाहिजे. अमरावती येथे आयोजित सभेत मी कुठेही वाईट वक्तव्य केले नाही. सार्वजनिक आणि सामान्य माणसांसाठी बोललो. मीडियाने ते का दाखवले नाही, असा उलट सवाल बच्चू कडू यांनी केला. आम्ही प्रत्येक तालुक्यात एक शाळा दत्तक घेऊन आदर्श करणार, आमदार रवी राणांचे आभारही मानले. ते दोन पावले मागे गेले तर मी चार पावले माघार घेईन असेही म्हणालो. पण, चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळत नाही. आणि वाईट गोष्टी लगेच दाखवल्या जातात, असे कडू म्हणाले.
-आता चांगल्या गोष्टीकडे लक्ष देणार
माझ्या मतदारसंघातील सापन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे 20 हजार एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. आता चांगल्या गोष्टीकडे लक्ष देणार असल्याचे कडू यांनी सांगितले. अशा वादात लोकांचे प्रश्न मागे पडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण लोकांचे प्रश्न मार्गी लागतच आहे. वीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ती काय माझी एकट्याची जमीन आहे, असा सवाल कडू यांनी केला.
-बच्चू कडू चौथी पास नाही
बच्चू कडू आता चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. माझेही वय 51 आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे यापुढे वादाचा विषय काढणार नाही. आम्ही एक तारखेपर्यंत मागितलेले पुरावे आले नाही. त्यामुळे वादाचा विषय संपला आहे. राणा यांनीही दिलगिरी व्यक्त केली. मी देखील आभार मानले आहे. राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाईन, असे कडू यांनी सांगितले.


