कसबा हरलो म्हणून काय झाले? पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले… पुन्हा!
-पवारांच्या प्रश्नाला प्रतुंत्तर
प्रतिनिधी
नागपूर : कसबापेठ पोटनिवडणुकीत आमचे काही चुकले असेल तर त्याची दुरुस्ती करू. त्यासाठी पुन्हा जनतेत जाऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी सांगितले आहे.
गेल्या 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. केवळ राज्यच नव्हे तर देशभरात बदलाचे वारे आहेत, असे शरद पवार म्हणाले आहेत.
–पवारांच्या बोलण्यात अर्थ नाही
शरद पवारांना प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवारांनी ईशान्येकडीर तीन राज्यांचे निकाल पाहीलेले नाहीत, असे दिसत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर झालेल्या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस साफ झाली आहे. भारत जोडो यात्रेनंतर ही तिन्ही राज्ये काँग्रेसच्या हातातून गेली. येथे भाजपने यश मिळवले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बोलण्यात अर्थ नाही.
–सहानुभूतीच्या लाटेवर कसब्याची पोटनिवडणूक
कसबा पोटनिवडणुकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रवींद्र धंगेकर यांनी सहानुभूतीच्या लाटेवर कसब्याची पोटनिवडणूक जिंकली आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या बाजुने सुप्त सहानुभूती होती. याऊलट हेमंत रासने प्रथमच निवडणुकीत उभे राहीले होते. त्याचा फटका त्यांना बसला. तसेच, ब्राम्हण समाजाने भाजपविरोधी मत दिले, हा दावाही चंद्रशेखर बावनकुळेंनी खोडून काढला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ब्राम्हण समाजाने कधीही देशविरोधी, संस्कृतीविरोधी मते दिली नाहीत. मात्र, या पोटनिवडणुकीत ब्राम्हण समाजाला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे.
–देशपांडे यांच्यावरील हल्ला निषेधार्ह
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. तसेच, हल्लेखोर हे ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याचेही समोर येत आहे. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाणे चुकीचे आहे. एखाद्या नेत्याला रस्त्यावर मारहाण होत असेल तर सरकार याची गंभीर दखल घेईल. तपास करुन हल्लेखोरांना नक्कीच शासन दिले जाईल.


