हे घ्या ! शिंदे गटाचे आमदार म्हणाले, तर पोलिसांना भगव्या टोप्या

हे घ्या ! शिंदे गटाचे आमदार म्हणाले, तर पोलिसांना भगव्या टोप्या
– राज्यभरात विधानाचे तीव्र पडसाद
प्रतिनिधी
नागपूर : मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, तर पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असे वादग्रस्त विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हिंगोलीच्या आमदाराने केले आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी हिंगोलीत निर्धार सभा झाली. या सभेद्वारे ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटाचे स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. त्यात त्यांनी बांगर यांचा उल्लेख साप म्हणून केला. आम्ही गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून आम्हालाच डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पुंगी वाजवली, दूध पाजले, सगळे वाया गेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

ठाकरेंच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. त्यात त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या कार्यक्रमाला वादग्रस्त कालीचरण महाराजही उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी पोलिसांना भगव्या टोप्या देण्याचे वादग्रस्त विधान केले. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

राज्यात आमची सत्ता आली तर सर्वांना भगव्या टोप्या देईल असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असे संतोष बांगर कावड यात्रेत भाषण करताना म्हणाले.

तत्पूर्वी, त्यांनी उद्धव ठाकरे यांची हिंगोलीतील सभा वेड्यांची जत्रा असल्याचा निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी वेड्यांची जत्रा भरवली. वेडे काहीच करू शकत नाहीत. त्यांच्या अंगावर धावून गेले की, ते भुर्रकन पळून जातात. त्यांच्या सभेचा आमच्या सभेवर कोणताही परिणाम पडणार नाही.