सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना का ठणकाविले ?

सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना का ठणकाविले ?

-भाजपाने दिले तितक्याच ताकदीचे उत्तर

प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले. हा यु टर्न चालणार नाही असे ठणकावत दोन व्हिडीओही त्यांनी ट्विट केले. त्यावर भाजपकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवरुन सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले की, विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.

– कुठले आहे दोन व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या वीज बील संदर्भातील भूमिकेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांचे सत्तेत येण्यापूर्वीचा आणि सत्तेत आल्यानंतरचा असे दोन व्हिडिओ शेअर केले व ‘हा यू टर्न आता चालणार नाही’ असेही ठणकावले.

सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या ट्विट केलेल्या पहिल्या व्हिडीओत (सत्तेत येण्यापूर्वी) ”मला मध्यप्रदेश सरकारचे अभिनंदन करायचे आहे. मध्यप्रदेश सरकारने 6 हजार 500 कोटी स्वत: देऊन, शेतकऱ्यांची वीज बिल माफ केले. महाराष्ट्रात मात्र रोज सावकारी पद्धतीने, वीज बिल वसूल होत आहे. महाराष्ट्र सरकारनेही मध्यप्रदेश प्रमाणे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचे पैसे महावितरणला द्यावेत, अशी आमची मागणी आहे.”

-कनेक्शन तोडणे बंद करायला पाहिजे

सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर ट्विट केलेल्या दुसऱ्या व्हिडीओत फडणवीस म्हणतात की, “कृषी पंपाच्या संदर्भात वसूली आपली सुरूच असते. त्यात काही प्रमाणात तक्रारी येत होत्या की आमचे कनेक्शन कापले जात आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आता रब्बीच्या पेरण्या करणे किंवा आता जे पीक घेता येईल, तो प्रयत्न त्यांचा चाललेला असताना मी असे सांगितले. जे बील भरू शकतात त्यांनी बील भरले पाहिजे. पण जे अडचणीत आहेत, त्यांनी चालू बील जरी भरले तरी त्यांना सध्या सूट देण्यात यावी त्यांचे वीज जोडणी कापण्यात येऊ नये, भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला वसूली करता येईल. त्यामुळे आता ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, अशा भागात सक्तीने वसुली न करता केवळ एक बील त्यांच्याकडून घेऊन आता कनेक्शन तोडणे बंद करायला पाहिजे.

-भाजपा म्हणते,  सरकार लवकर विस्मृतीत

भाजपने सुप्रिया सुळेंच्या ट्विटचा समाचार घेत भाजपने पलटवार केला. सुप्रियाताई, नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामेच करायचे नाही, केले तर सात-आठ महिने जीआर काढायचे नाही, जीआर काढले तर मदत वाटायचीच नाही, अशा थाटात चाललेल्या आपल्या सरकारची आठवण इतक्या लवकर विस्मृतीत गेली?