राजकीय वर्तुळात खळबळ : अजितदादा हे काय बोलले ?

राजकीय वर्तुळात खळबळ : अजितदादा हे काय बोलले ?

-म्हणाले, अर्थमंत्रीपद टिकेल की नाही माहित नाही

प्रतिनिधी
मुंबई : आज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही टिकेल, सांगता येत नाही,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बंददाराआड चर्चेसाठी अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला या विषयावर काही बोलायचे नाही. मला विकासाबद्दल विचारा. मी विकासासाठी बैठका घेतोय. माझे ध्येय फक्त विकास एके विकास एवढाच आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा संसदेतील फोटो व्हायरल झाला आहे. त्यांचा या फोटो बद्दल शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या विषयावर त्यांना प्रश्न करण्यात आला होता. बारामतीमध्ये एका कार्यक्रमात सहकार संस्था आणि कारखान्यांसंदर्भात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाइल्स आमच्यापुढे यायच्या. त्यात कोणत्या गावांची नावे आहेत, हे बघायचे, बारामतीचे नाव नसेल, तर टाकायचे आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रूपयांचं मॅग्नेटचे काम मिळाले, असा किस्साही अजित पवार यांनी सांगितला.

शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांनी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला तक्रार करण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसवून त्यावर निर्णय देतील.