मोदींचे ठरले; ७५ हजार बेरोजगारांना थेट नोकरीचे पत्र
-दहा लाख पदांवर भरतीची माेहीम
प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी १० लाख पदांवर भरती करण्याची मोहीम सुरू करतील. त्याला ‘रोजगार मेळा’ असे नाव देण्यात आले आहे. त्यात ७५ हजार तरुणांना नियुक्तिपत्र दिले जाईल. पंतप्रधानांनी या वर्षी जूनमध्ये सरकारच्या विविध मंत्रालयांना आणि विभागांना मिशन मोडद्वारे १० लाख पदांवर भरती करण्याचे निर्देश दिले होते. त्याच योजनाचा हा बाग असल्याचे समजते.
देशभरातून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारच्या ३८ मंत्रालयांत आणि विभागांत नियुक्त केले जाईल. या नियुक्त्या केंद्र सरकारच्या गट-अ, गट-ब राजपत्रित आणि गट-क च्या पदांवर होतील. केंद्रीय सशस्त्र दल कर्मचारी, उपनिरीक्षक, काॅन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, प्राप्तिकर निरीक्षक आणि एमटीएसच्या नियुक्त्या आहेत.
-पंतप्रधान केदारनाथ दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी केदारनाथला जातील. ते सकाळी ८.३० वाजता केदारनाथ मंदिरात जातील. ते केदारनाथ रोपवेचा शिलान्यास, शंकराचार्य समाधी दर्शन तसेच मंदाकिनी भक्तिमार्ग आणि सरस्वती भक्तिमार्गाची पाहणी करतील. मोदी ११.३० वाजता बद्रीनाथमध्ये पूजाअर्चा करतील आणि १२.३० वाजता माना गावात लोकांना संबोधित करतील.


