महाराष्ट्रात मध्यावधी; विविध पक्षांचे संकेत

महाराष्ट्रात मध्यावधी; विविध पक्षांचे संकेत

-कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या सत्तेवर आलेले शिंदे गट आणि भाजपचे सरकार कोसळण्याची शक्यता गेल्या चार-पाच दिवसांपासून होत आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार भाजप फोडणार असल्याची चर्चा असतानाच महाविकास आघाडीतील नेते मात्र राज्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकित वर्तवित आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मध्यावधीची शक्यता वर्तविल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मध्यावधीची शक्यता वर्तविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे ४ ते ५ नोव्हेंबरला मंथन व वेध भविष्याचा, हे शिबिर पार पडले. या शिबिरापूर्वी नगर येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डी येथील आमचे शिबिर झाल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत त्यांच्या गटातील नऊ ते दहा लोक थांबतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागतील, असे वाटते. खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यावेळी सरकार पडले होते, आता राष्ट्रवादीचे अधिवेशन झाल्यानंतर त्यांचा पक्ष फुटेल, अशी टीका जयंत पाटील यांनी एका अधिवेशनानंतर यापूर्वी सरकार पडले होते. आता आमच्या अधिवेशनानंतरही सरकार पडणारच आहे, असे म्हटले होते.

औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मध्यावधी होण्याची शक्यता वर्तविली होती. देवेंद्र फडणवीस हुशार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत. यातून ते त्यांचे मुख्यमंत्रिपद मिळवून घेतील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले : दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ठाकरे यांनी ‘तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, कार्यकर्त्यांपर्यंत जा’, असे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवे, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना केल्यात.

मध्यावधी शक्य : बाळासाहेब थोरात ‘राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता मध्यावधी होतील, असे वाटते. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राजकीय अस्थिरता असल्याने राज्यातील राजकीय परिस्थिती बदलू शकते,’ असे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात अकोला येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले. थोरात म्हणाले की, काँग्रेस दोन टप्प्यात विभागली असेल, असे होणार नाही. भाजपवाल्यांनी असे स्वप्नही पाहू नयेत. ते अशी स्वप्नं पाहतात, असे व्हावे, तसे व्हावे. काही होणार नाही. याउलट, भारत जोडो यात्रेमुळे देश जोडला जाणार आहे. जो भाजपला नको आहे. त्यांना भेद पाहिजे. आम्ही देश जोडण्याचे काम करतोय.