भाजपाचे उठसुठ बारामती: पवारांच्या गडावर डोळा

भाजपाचे उठसुठ बारामती: पवारांच्या गडावर डोळा

-निर्मला सीतारामन पुन्हा बारामती दौऱ्यावर

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि मजबूत पक्ष अशी ख्याती असलेल्या शिवसेना पक्षाला खिंडार पाडल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिशेला वळवल्याचं चित्र आहे. कारण भाजपच्या गोटात हालचालीच अगदी तशा घडताना दिसत आहेत. भाजप
नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे सीतारामन दीड महिन्यांपूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्या तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत.

निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह 11 आणि 12 नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर येणार आहे. सीतारामन यांच्या मागच्या दौऱ्यापेक्षा यावेळचा दौरा खूप मोठा असेल. हा दौरा खूप मोठा आणि आकर्षक करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष असेल, अशी माहिती सूत्रांची आहे.

-भाजपचा बारामतीत का ठिय्या ?

भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी बारामती मतदारसंघात प्रचंड जोशात प्रचार केला होता. भाजपकडून बारामतीत अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवार या सेकंड लीडला होत्या. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्यात.

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात ताकद लावण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर पवारांची वेगळी माया आहे. त्यांचे बारामतीवर प्रेम आहे.

शरद पवार आणि बारामती यांचे परस्परांशी भावनिक नातं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वात प्रमुख नेत्याला त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवलं तर त्याचा परिणाम अर्थातच कार्यकर्त्यांवर पडेल. त्याचबरोबर पक्षातही नकारात्मक वातावरण पसरेल, अशी भाजपची धारणा असू शकते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपचे जास्त लक्ष आहे.

-अजित पवार नाराज की आणखी काही ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनपेक्षित अशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार सध्या आजारी आहेत. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली. त्यांच्या या कृत्यावर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करुन निषेध व्यक्त केला जातोय. पण पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळख असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार काहीच बोलले नाही.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशीदेखील उपस्थित नव्हते. खरंतर त्यादिवशी शरद पवार हाताला बँडेज बांधून कार्यक्रमात पोहोचले होते. तिथे त्यांनी पाच मिनिटे भाषण केलं होतं. नंतर पुन्हा हॅलिकॉप्टरने मुंबईत परतले होते आणि रुग्णालयात दाखल झाले होते. असं असताना तिथे अजित पवार उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

-राष्ट्रवादी फूटणार?

या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या आठवड्यात धक्कादायक दावा केला. राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होते.