का म्हणाले मोदी ? काही नेत्यांच्या शॉर्टकट राजकारणामुळे देश धोक्यात

का म्हणाले मोदी ? काही नेत्यांच्या शॉर्टकट राजकारणामुळे देश धोक्यात

-नागपुरात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणप्रसंगी सजग इशारा

प्रतिनिधी

नागपूर : देशातील सामान्य जनतेला भारतीय राजकारणात नव्याने येत असलेल्या एका विकृतीपासून सावध करू इच्छितो. ती विकृती म्हणजे शॉर्टकटचे राजकारण. देशातील काही नेते शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नादात देशाच्या तिजोरीतील पैसा आणि सामान्य करदात्यांची कमाई उधळून लावत आहेत, अशांपासून सावध राहा, असा सजग इशारा पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना दिला.

ते रविवारी(11डिसेंबर )नागपूरमध्ये हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, या स्वार्थी राजकारणामुळे भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा गंभीर धोका आहे. त्यामुळे कोणतेही पायाभूत प्रकल्प उभारताना त्यामागे दीर्घकालीन धोरण आणि शाश्वव विकासाचा दृष्टीकोन असला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

११ प्रकल्पांना एकप्रकारचा ह्युमन टच

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पायाभूत सुविधांची उभारणी करताना मानवी संवेदनांचा विचार झाला पाहिजे, असे सांगितले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी महाराष्ट्रातील गोसीखुर्द धरण प्रकल्पाचे उदाहरण दिले. समृद्धी महामार्गासह आज उद्घाटन झालेल्या ११ प्रकल्पांना एकप्रकारचा ह्युमन टच आहे. पण अनेकदा पायाभूत सुविधांची उभारण करताना मानवी संवेदनांचा विचार केला जात नाही. त्यामुळे जनतेला मोठे नुकसान सोसावे लागते. महाराष्ट्रातील गोसीखुर्द प्रकल्प हे त्याचे उदाहरण आहे. या धरणाची पायाभरणी ३० ते ३५ वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी या धरणाच्या उभारणीसाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे या धरणाचे काम अनेक वर्षे रखडले. आता या धरणाचा खर्च १८ हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आता ३० वर्षानंतर हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे. पण महाराष्ट्रात २०१७ पासून डबल इंजिन सरकार आल्यापासून या धरणाचे काम वेगाने झाले. संबंधित समस्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रासाठी डबल इंजिन सरकार किती फायदेशीर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला.

– ही चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी

शॉर्टकटचे राजकारण करणारे नेते हे देशातील करदात्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता हडपणे हेच आहे. ते कधीही देश उभारू शकत नाहीत. आज भारत पुढील २५ वर्षांचे लक्ष्य समोर ठेवून काम करत आहे. अशावेळी काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू पाहत आहेत. जगात यापूर्वी तीनवेळा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा भारताला त्याचा लाभ उठवता आला नाही. पण आता चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी दवडून चालणार नाही. अशी संधी वारंवार कोणत्या देशाला मिळत नाही. कोणताही देश शॉर्टकर्टने चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थिर विकास, शाश्वत उपाय आणि दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे. यामध्ये पायाभूत प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि आखाती देशांचा विकास हा पायाभूत सुविधांमुळे झाला. या देशांमध्ये शॉर्टकर्टचे राजकारण झाले असते तर हे देश आज या उंचीवर पोहोचू शकले नसते.

अशा राजकारण्यांना उघडं पाडा

यापूर्वीच्या सरकारांनी करदात्यांचा पैसा भ्रष्टाचार आणि आपापली व्होटबँक मजबूत करण्यासाठी वापरला. सरकारी तिजोरीतील एक एक पैसै देशाच्या भविष्याच्या निर्माणासाठी वापरला गेला पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येक करदात्याला आवाहन करतो की, शॉर्टकर्टचे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना उघडं पाडा. अन्यथा हे राजकारणी भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.