उचलबांगडी ! राज्यपालांचा लवकरच महाराष्ट्राला टाटा

उचलबांगडी ! राज्यपालांचा लवकरच महाराष्ट्राला टाटा
-फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

प्रतिनिधी
मुंबई: भाजप पक्ष कायम उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीसांचे हे वक्तव्य म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरील कारवाईच्या दृष्टीने सूचक संकेत मानले जात आहेत. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील कारवाईसाठी आग्रह धरला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर काहीवेळातच देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. हे वक्तव्य करताना फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली असली तरी राज्यपालांवर कारवाई झाल्यास त्याला शिंदे-फडणवीस सरकारचा त्याला नकार नसेल, असा अप्रत्यक्ष अर्थ त्यामधून निघत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती भगतसिंह कोश्यारी यांना भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पायउतार होण्याचे आदेश देणार का, हे पाहावे लागेल.

-राजभवनाची खिंड पडली…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी विरोधक आणि शिवप्रेमी संघटनांकडून आग्रही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पद सोडण्यास तयार असल्याचा दावा केला होता. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच!जय महाराष्ट्र!, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, त्यानंतर लगेचच राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. राज्यपालांच्या राजीनाम्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचे राजभवनातून सांगण्यात आलं आहे. या वृत्ताचे आम्ही खंडन करत आहोत अशी प्रतिक्रिया राजभवनातून देण्यात आली.

-फडणवीसांनी आरोप एका फटक्यात फेटाळले
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांची बाजू लावून धरली होती. राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगत फडणवीसांनी विरोधकांचे सर्व आरोप एका फटक्यात फेटाळून लावले होते.या जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. मला वाटत नाही की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका असेल. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

-उदयनराजे भोसले ढसाढसा रडले
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात कारवाई करायची नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका, असा अप्रत्यक्ष टोला भाजपला लगावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सध्या ज्याप्रकारे अपमान होत आहे, तो दिवस पाहण्याआधी मी मेलो असतो तर बरे झाले असते. शिवाजी महाराजांची ही अवहेलना पाहवत नाही, असे उदयनराजे यांनी म्हटले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले अत्यंत व्यथित होताना दिसले. पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांचे डोळे पाणावले.