नागपूर मनपासाठी हा राहील भाजपाचा प्रचाराचा मुद्धा

नागपूर मनपासाठी हा राहील भाजपाचा प्रचाराचा मुद्धा

-पत्रकार परिषदेतून दिले स्पष्ट संकेत

प्रतिनिधी
नागपूर : मागील १५ वर्षापासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला नागपुरात एकही अशी योजना राबवता आली नाही की ज्याच्या आधारावर ते आगामी निवडणुकीत मते मागू शकतील. उलट ज्या योजना राबवल्या त्याप्रती जनाक्रोशच अधिक दिसून आला. त्यामुळेच येत्या निवडणुकीत हा पक्ष केद्राच्या योजनांवर प्रचारात भर देणार आहे. मोदींच्या ११ वर्षाच्या कार्यकाळानिमित्त शहर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून याचे स्पष्ट संकेत मिळाले.

महापालिका निवडणुकचेी प़डघम वाजू लागले आहेत, प्रभाग रचना कधीपर्यंत पूर्ण करायची याचे वेळापत्रकही निश्चित झाले आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने शहर भाजपने अनेक कार्यक्रमांची घोषणा केली. या कार्यक्रमांची आखणीच महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच करण्यात आली. १२ जूनपासून सुरू झालेला हा कार्यक्रम २५ जूनपर्यंत चालणार आहे. भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्राच्या विविध योजनांचा पाढा वाचला. विकसीत भारताच्या अमृतकाळातील सेवा, सुशासन, गरीब कल्याणाच्या योजनांची माहिती दिली. यातूनच महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा केंद्राच्या योजनांच्या प्रचारावर भर असेल याचे संकेत मिळाले. केंद्र, राज्य आणि महापालिकेतही दीर्घकाळ सत्ता असलेल्या पक्षाला प्रचारासाठी केंद्राच्या योजनांवर अवलंबून राहावे लागणे याचा अर्थ महापालिकेतील पक्षाच्या सत्ताकाळात एकही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही हे स्पष्ट होते.

१५ वर्ष महापालिकेत सत्ता
२००७, २०१२ आणि २०१७ अशा तीन सलग महापालिका निवडणुका जिंकणारा भाजप महापालिकेत १५ वर्षापासून सत्तेत होता. २०१४ ते आत्तापर्यंत मधले अडिच वर्ष महाविकास आघाडीचे सोडले तर भाजपचीच राज्यात सत्ता आहे, केंद्रातही अकरा वर्षापासून हाच पक्ष सत्तेवर आहे. सत्तेची सर्व प्रमुख केंद्रे हाती असल्यावर नागपूरचा विकास इतर शहरांना मागे टाकणारा व्हायला हवा होता. प्रत्यक्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून पायाभूत सुविधांचा झालेला विकासाचा अपवाद सोडला तर नागपूर नागरी सुविधांच्या बाबतीत इतर महानगरांच्या तुलनेत कितीतरी मागे पडले आहे. उलट ज्या योजनांचा प्रचार, प्रसार या पक्षाचे नेते करीत होते त्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेबाबत भाजपचेच नेते बोटे मोडतांना दिसत आहे. सिमेंट रस्त्यांचा गवगवा करण्यात आला, आता या रस्त्यांमुळे लोकांच्या घरात पाणी शिरत असल्याने लोक संताप व्यक्त करीत आहे, त्यामुळे या दोन्ही योजनांचा प्रचार भाजप करू शकत नाही. इंदोरसारखे नागपूर करू म्हणून खुप गाजावाजा करण्यात आला. पण शहराची सध्याची कचरा उचलण्याची यंत्रणा या महानगराला शोभणारी नाही. त्यामुळे भाजप त्यांच्या महापालिकेतील सत्ता काळात राबवलेल्या योजनांच्या जोरावर निवडणुकांमध्ये प्रचार करू शकत नाही, त्यामुळे केंद्राच्या योजनांवर भर दिला जात असल्याचे स्पष्ट होते.

spot_img