कारण ठरले : या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागितला थेट राजीनामा
– दोन्ही घटनांनी आंध्र हादरले
प्रतिनिधी
आंध्र प्रदेश : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामागचं कारण म्हणजे, महिलांच्या सुरक्षितेच्या मुद्द्यावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. तर श्री सत्य साई जिल्ह्यातही एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच मुद्द्यांना हाताशी धरून वायएसआर काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली असून चंद्राबाबू नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विरोधीपक्षाची आक्रमक भूमिका लक्षात घेता मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या दोन्ही घटनांची तातडीने चौकशी पूर्ण करून पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.
पहिली घटना : १४ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या
३ जून रोजी अनंतपूरमधील १४ वर्षांची मुलगी शीतपेय विकत घेण्यासाठी घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोधाशोध केली असता, दोन दिवसांनी एका शाळेच्या पाठीमागे तिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत १० जून रोजी एका फरशी कामगाराला अटक केली. आरोपी हा मुलीच्या घराशेजारीलच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अनंतपूरचे पोलीस अधीक्षक पी. जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी के. नरेश (वय २७) हा विवाहित असून त्याचे मृत अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते.