मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली भेटीत ही झाली चर्चा, राष्ट्रवादीच्या विलीनीकरण…?
-पुढील काळात मोठ्या राजकीय घडामोडी
प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाले, त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशिरा भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा पुरेसा तपशील कळू शकला नाही. परंतु, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधनानंतरची राजकीय परिस्थिती, राष्ट्रवादीचे संभाव्य विलिनीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलरोजी संपत आहे. या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत फडणवीस-शाह यांच्यात चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजपकडून बहुतांश नवीन चेहरे दिले जातील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे गेली तर भाजपची भूमिका काय असावी यावर फडणवीस यांनी शाह यांचा सल्ला घेतल्याचीही माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुद्धा काही दिवसांपासून राजधानीत रंगली आहे. हा पहिलाच विस्तार असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. यानंतर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचे मध्यांतर किंवा त्यांनतर मंत्रिमंडळाचा विस्तार होवू शकतो. तोवर राष्ट्रवादी एकत्र येईल का आणि त्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या आहे.


